Wednesday, April 17, 2019

विठ्ठला अजब तुझे सरकार ...



काल संध्याकाळी माझ्या ५ वर्षांच्या मुली बरोबर (ओवी ) खेळत होतो ... तेव्हा आमच्यात झालेले संभाषण ...
ओवी : बाबा आज मी तुला विठ्ठल आणि पुंडलिकाची गोष्ट सांगते ... 
मी     : चालेल ...
ओवी : एकदा ना विठ्ठल असतो ना त्याचा भक्त पुंडलिक... दोघे जण देवळात असतात ... पुंडलिकाने विठ्ठलाच्या मूर्तीला जेवणाचं ताट ठेऊन गोल गोल पाणी फिरवलेल असत...
मी     : अगं त्याला नैवेद्य म्हणतात...
ओवी : हां... तर पुंडलिकाने विठ्ठलाच्या मूर्तीला नैवेद्य दिलेला असतो...
मी     : विठ्ठलाला नैवेद्य दाखवलेला असतो असा म्हणायचं ...
ओवी : नाही रे, मूर्ती ला...
मी     : अगं ... मूर्ती आणि विठ्ठल एकच ना
ओवी : नाही...  मूर्ती काळी असते , विठ्ठल पांढरा असतो...
मी     : नाही ... विठ्ठल सावळा असतो... म्हणजेच काळा ...
ओवी : नाही .. विठ्ठल पांढरा असतो ... TV  मध्ये बघितलंय मी...
मी     : तू ते गाणं ऐकलंयस  ना... देव माझा विठू सावळा ... मग ...
ओवी : (२ मिनिटं  विचार करून )... विठ्ठल पांढराच असतो पण ते गाणं विठ्ठलाच्या मूर्ती साठी लिहिलंय ना...
मी     : (स्पीचलेस ... हाताची घडी तोंडावर बोट )

TV वर मालिका दाखवणाऱ्या लोकांना कोणीतरी सांगा कि ह्या गोरेपणाच्या वेडातून निदान देवाला आणि मुलांना तरी सोडा म्हणावं ...

Wednesday, August 29, 2018

आमचे उपासाचे प्रयोग …

आमचे उपासाचे प्रयोग …

एक आटपाट नगर होतं (अशी सुरुवात केली कि नक्की किती दिवसापुर्वीची गोष्ट आहे याची चौकशी होत नाही असा अनुभव आहे) . तिथे अस्मादिक मंडळींचे दोनाचे चार हात करायची गडबड सुरु झाली होती (चाणाक्ष मंडळींनी बडबड असे वाचावे) …

मुलींच्या बाबतीत तसा मी पहिल्या पासून लाजराच… एखादी चुकून स्वताहून बोलायला आलीच तर शोएब अख्तर च्या बोलिंग समोर वेंकटपथी राजूने बैट्टींग करावी तशी आमची बोबडी वळायची …. म्हणून प्रेमविवाह प्रकार घरच्यांनी इशांत शर्माच्या ब्याटिंग इतकेच ऑप्शन ला सोडले होते … तसा पगार वगैरे बरा होता आणि शिक्षण सुद्धा (चिकाटीने) पूर्ण झालेलं…. त्यामुळे लवकरच आमच्या "वधू संशोधन" मोहिमेला यश आलं  आणि माझ्या हातांची संख्या दुप्पट (आणि पगार निम्मा कट) होण्याचा मुहूर्त निघाला …

मित्रांनी लग्न ठरलं म्हणून पार्टी उकळली (तसंही ठरलं नसतं  तर दुःख हलकं  करायला द्यावीच लागली असती) … आणि पार्टी मध्ये एकाने बॉम्ब टाकला … चिन्या (हे माझं ग्रुप मध्ये घेतलं जाणारं सगळ्यात आदरयुक्त नाव आहे … बाकीची नावं टाकल्यास ब्लॉग सेन्सॉर होण्याची शक्यता आहे… बाकी समजून घेणे)… चिन्या लेका लग्नाचे फोटो आयुष्यभर दाखवावे लागतात … बारीक हो जरा …

आता खाल्ल्या मिसळीला ज्याने जागावे तोच असं अभद्र काहीतरी बोलून गेल्यावर वातावरण एकदम सिरियस झाले … अवध्या नामक मित्राने त्याला तिथल्या तिथे झापले … "तुला डोक-बिक काही आहे का ?? पार्टी ला बसलोय ना आपण ??"…
जवळपास २-३ मिनिटे भयाण शांततेत गेली आणि अवध्या पुन्हा बोलला "तुला जे काही बोलायचे ते त्याने बिल भरल्यावर बोल"… 
झाले !!!

दुसऱ्या दिवसापासून आमचे "डाएटपुराणाचे" अध्ययन सुरु झाले …
बटाटा वर्ज्य, बाहेर खायचे नाही (मिसळ बंदी) आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे दाणे-गुळ चघळणे बंद … हे सगळे नियम वाचून या पेक्षा १३, १७, १९, २३ आणि २७ चे पाढे पाठ करणे सोपे असा साक्षात्कार मला झाला ...

या सगळ्यावर कडी केली ती म्हणजे व्यायामाने … सकाळी ६ ला उठून पळायला जाणे …
 पहिल्या दिवशी इतक्या पहाटे मी मैदानात आलेला बघून आमच्या इथले २-३ आजोबा चक्कर येउन पडले आणि साक्षात सुर्यनारायणाने लाजेने आपले तोंड ढगाच्या मागे लपवले … सलग २-३ दिवस पाउस पडला आणि प्रथमग्रासे मक्षिकापातः या न्यायाने मी एका आठवड्यानंतर का होईना नियमित (आठवड्यातून ३-४ वेळा) व्यायामाला सुरुवात केली …

उपवासाची पथ्य पाळणे सुरुवातीला तसे सोपे वाटले … एकदम सगळं डाएट फॉलो करणं शक्य नसल्याने पहिले बाहेरचे खाणे कमी करायचे ठरवले … २-३ आठवडे गेले बरे पण मित्रांना भेटायला गेलो कि रोज आग्रह व्हायचा , नाही खाल्ले तर पुन्हा "अजून किती दिवस तू येणारेस, लग्न झालं कि कुठला भेटतो तू ??" असं इमोशनल ब्लैकमेल सुरु … नाही तरी किती वेळा म्हणणार ना? मग त त्यातल्या त्यात डाएट च समाधान म्हणून मित्रांनी २ वडा-पाव खाल्ले तर आपण एकच खाणे, चहा अर्धा कटिंग घेणे असे आमचे चालू होते .. पण चतुर्भुज होण्याची तारीख ३ महिन्यावर आली तरी आमच्या एकूण आकारमानात काही फरक दिसेना ... त्यात शेजारच्या आजोबांनी जरा प्राणायाम आणि योगासन कर ... मी बघ या वयात सुद्धा कसा स्लिम आणि ट्रिम आहे ... असा उपदेश केला आणि योगासने नावाच्या अवघड प्रकारची ओळख झाली ... (खरं  तर ते आजोबा स्लिम ट्रिम आहेत, पण त्याच रहस्य डायबेटिस मुले बंद झालेलं  गोडधोड आणि कवळी मुळे कमी झालेलं जेवण हे आहे ... असो... असते एकेकाची बढाई मारायची सवय... ).

योगासन हा प्रकार खरं म्हणजे दिसायला खूप सोपा वाटलं होता ... पण शवासन सोडून कोणतेच आसन मला जमेना (खरं तर शवासन देवानेच शिकवून पाठवले होते - त्यामुळे शवसनातून मला जागृत अवस्थेत आणायला घरच्यांना फार त्रास होत असे )... अंगाच्या चित्र विचित्र गाठी मारायच्या आणि त्या पुन्हा सोडायच्या .. ते सगळं जमायला तुम्ही मुळातच बारीक आणि लवचिक असावं लागत ... आणि ज्यांना ते जमतं  ते बघून बाकीच्या लोकांना वाटत कि तो योगासनांचा इफेक्ट आहे ... जाऊदे ...

मी मनावर घेतलं .. ठाम निश्चय केला आणि एक वेळ जेवण बंद असं घरी सांगितलं ..
पण केळवण या गोंडस नावाखाली माझा हा निश्चय सुद्धा मोडून काढला गेला ... (तसे आयुष्यातले बरेच निश्चय मोडण्यासाठीच असतात जसे कि , कधीच लग्न न करणे, मोठेपणी  बस चा ड्राइवर किंवा कंडक्टर होणे ई.)...

असो तर भरपूर प्रयत्नांती आमची उपासाची गाडी रडतखडत का होईना सुरु झाली ...
उपसामध्ये किती तरी नवीन गोष्टींशी परिचय झाला ...
आयुष्यात पहिल्यांदा निग्रहाने समोर आलेल्या मिसळीला नाही म्हणताना सांगून आलेलं ऐश्वर्या रायचं स्थळ नाकारल्याचे भाव चेहऱ्यावर उमटले होते ...
साखर आणि दूध न घातलेला आरोग्यकारी ग्रीन टी आणि पूजेच्या वेळी जबरदस्ती करून पाजलं जाणारं गोमूत्र हे एकाच चवीचे असतात हे समजून आले ...   (एखादी गोष्ट जितकी जास्त बेचव तेवढी जास्त आरोग्यकारी - इति डॉक्टर... )
बटाटा आणि बेसन या दोन गोष्टी वर्ज्य केल्या तर भारतात जगणे अशक्य आहे यावर माझा विश्वास बसला ... आणि सगळयात महत्वाचे म्हणजे, दोन दिवसाच्या भरपेट जेवणाने हवा भरलेल्या फुग्यासारखे पटकन फुगणारे पोट , कमी होताना मात्र गोगलगायीपेक्षा हळू हळू कमी होते ...
नाश्त्याला मिसळ, पोहे किंवा बटाटावडा सांबर च्या ऐवजी कॉर्नफ्लेक्स खाताना कपाळकरंटेपणा या शब्दाचा डिक्शनरी बघूनही ना समजलेला अर्थ समजला .... नेहमीच्या टपरीवर चहा प्यायला गेलो असताना मी बिना साखरेच्या चहाची ऑर्डर दिल्यावर चहावाला अण्णा फिट येऊन पडायचा राहिला होता...

पूर्वीच्या काळी जे ऋषी-मुनी उपास करायचे त्यांना देव लगेच का वरदान द्यायचे ते मला अक्षरशः पटले …

असो... तर इतका आटापिटा करून कणभर का होईना, आत गेलेलं पोट बघून किंचित समाधान वाटायचं ...

पण फोटोग्राफर नावाच्या नतद्रष्ट प्राण्याला तेही सुख मंजूर नसावं ... कारण खुद्द लग्नाच्या दिवशी बायको समोर लाज काढायचं पाहिलं काम त्या प्राण्याने (माझ्याकडूनच भरपूर पैसे घेऊन) अगदी नेमकं पार पाडलं ...
"अहो, जरा पोट आत घ्या आणि मान सरळ करा " या एका वाक्याने माझी ४ महिन्याची सगळी मेहनत पूर्ण पाण्यात गेली होती ... आणि हे इतकं बोलून परत "स्माईल प्लिज" म्हणायचे धाडस निव्वळ हातात कॅमेरा असल्याने तो करू शकला आणि आमचा (कसनुसा) हासलेला फोटो काढला...

भरपूर पैसे मोजून (आणि वर  खुशी वेगळी देऊन) ते फोटो ताब्यात घेतले आणि तेव्हा पासून आज पर्यंत डाएटच्या वाटेला गेलो नाही ...







Monday, February 27, 2017

माय मराठी

मराठी ...
नुसतं इतकं म्हणलं तरी आई च्या कुशीत येऊन बसल्याचा भास होतो असा हा शब्द ...
कोणी त्याला संस्कृती म्हणालं तर कोणी भाषा, कोणी मराठीला स्वतःची अस्मिता मानलं तर कोणी बाणा ... पण सर्वात समर्पक उपमा मिळाली ती मात्र "माय मराठी" ...
या जगाशी ओळख करून देणारी .. आपल्या चिमुकल्या भावनांना व्यक्त करण्यातून सृजनाचा आनंद देणारी माय ..
बोबड्या बोलांनी बडबड गीते म्हणताना, बे एके बे म्हणत अंकांशी गट्टी करताना, मराठी बाणा म्हणजे काय हे शिवाजीच्या इतिहासातून शिकताना आणि स्वातंत्र्याचे मोल स्वातंत्र्यवीरांच्या उस्फुर्त आणि अद्भुत स्वरातून अनुभवताना या आईचा पदर धरूनच मोठा कधी झालो हे कळलंच नाही ...
या मराठीच्या समृद्ध विश्वाचा आस्वाद घेताना "किती देशील दोन्ही करांनी" या म्हणीचा खरा अर्थ उमगला ...
या आईची रूपे तरी किती सांगावी ...
पहाटेच्या वेळी ऐकू येणारी वासुदेवाची वाणी, भीमसेनी स्वरांनी सजलेले अभंग, जात्यावर दळण दळताना सहज रचलेल्या ओव्या, विठ्ठलाच्या भक्तिरसात तल्लीन होऊन म्हणाला जाणारा हरिपाठ, कीर्तन आणि प्रवचन, समाज प्रबोधनासाठी रचलेली भारुडं, पराक्रमी पुरुषाचे पराक्रम शब्दातून समोर उभी करणारी शाहिराची जोरदार कवनं, मोगऱ्याचा गजरा गुंफावा तसे नाजूक तरी भावपूर्ण सुगम संगीत, शृंगाराची झलक दाखवणारी तरी खानदानीपणाची कास न सोडणारी लावणी, तुलसीदासांच्या रामायणाइतकेच अदभूत आणि सुंदर गीत रामायण...
पुलंच्या विविधरंगी लिखाणातून जसे मराठी मनाचे अंतरंग उलगडतात तसेच वपुंच्या अलंकारिक शब्दांनीं तिचे अनघट सौंदर्यवती रूप अनुभवले...

आज मराठी दिनाच्या निमित्ताने खूप शुभेछया आल्या.. बऱ्याच शुभेच्छांचा सूर एकूणच निराशावादी होता ... बदलत्या काळाने केलेले आघात आपली मायमराठी सहन करू शकेल का हि शंका दिसत होती .. मुलांना मराठी शाळेत घालायला पाहिजे ... इंग्रजीचा हट्ट सोडून द्या वगैरे ...
काळ बदलला, तशी भाषा पण बदलली... खोली, दिवा, गच्ची, नाश्ता इत्यादी शब्द हल्ली ऐकायला पण मिळत नाहीत ... इमारत, स्थानक वगैरे तर अश्मयुगातले शब्द वाटतात ... वाटत कि आपली इतकी सुंदर भाषा खरंच अजून ४०-५० वर्षे तरी टिकेल कि नाही ... "मायमराठी" ची मदर मराठी ना होवो म्हणजे मिळवलं ...
बदलत्या काळाप्रमाणे बदलत जाणे हा तर कोणत्याही भाषेचा स्थायीभाव ... आणि म्हणूनच मराठी अजूनही टिकून आहे, राहील ... जो पर्यंत चांदोमामा, गणपतीबाप्पा, उंदीरमामा, झुकझुकगाडी लहानग्यांना भुरळ घालत राहतील, दिवेलागणीला शुभंकरोती म्हणाले जाईल , आरती साठी सुखकर्ता दुःखहर्ता ला पर्याय नसेल  तो पर्यंत तरी माझी मराठी दिमाखातच असेल... म्हणून माझा सूर निराशावादी नाहीये..
पण आज या आईच्या आठवणीने एक गोष्ट मात्र सांगावीशी वाटते... निदान तिचा अपमान नका करू ...

मराठी मधून शिकणाऱ्या मुलांना थर्ड क्लास समजणं, रिक्षावाल्याशी आणि वेटर शी बोलताना स्वतःहून हिंदीत बोलणं, मुलांना अ आ इ ई च्या आधी A  B C D शिकवणं आणि वर या सगळ्याचा अभिमान बाळगणं बंद करा ... अगदी टेबल ला "मंचक" आणि गॅलरी ला "सज्जा" म्हणायची गरज नाहीये..आणि सगळ्यांनी मराठी शाळेत शिकावं अशी अपेक्षा पण नाहीये... पण निदान तिची उपेक्षा करू नका .. माझ्या मुलाला मराठी जास्त समजत नाही, आम्ही त्याच्याशी इंग्लिशमध्येच बोलतो, हे सांगण्यात धन्यता कसली मानता?

प्रत्येकाचे विचार वेगळे असतात हे मान्य... म्हणून कोणावर सक्ती करून काहीही साध्य होणार नाही... पण निदान आपण चार चौघात मराठीला प्रतिष्ठेने वागवले तर सोशल प्रेशर मुळे झेपत नसतानाहि इंग्रजी कडे जाणाऱ्यांचा ओघ तरी थांबेल...

घरी किंवा कार मध्ये मराठी संगीत ऐकणं , मराठी पुस्तके नियमित आणणं, एखाद्या वेळी मराठी नाटकाला जाणं, कधी एखाद्या गडावर आपल्या चिमुकल्याला नेऊन तिथल्या इतिहासाची माहिती करून देणं.. आठवड्यातून एखादे वेळी श्लोक, शुभंकरोती किंवा स्तोत्र म्हणणं, एखादी अंगाई म्हणून किंवा "चल रे भोपळ्या टुणूक टुणूक" ची गोष्ट सांगत मुलांना झोपवणं ..  इतकं केलं तरी हि खूप होईल ...
आपल्या आधीच्या कितीतरी पिढ्यांनी खूप कष्ट घेऊन हा ठेवा समृद्ध केला आहे... भले त्यात भर घालणं नसेल जमत आपल्याला, निदान आहे ते तसंच जपून ठेऊ आणि आपल्या चिमुकल्यांना देऊ ...
कोणास ठाऊक त्यांच्यातीलच कोणी गदिमा, कुसुमाग्रज किंवा राम गणेश गडकरी होऊन आपल्या आईचे पांग फेडेल ...

Thursday, November 24, 2016

How CNN defeated ISIS without a gun...

Media Impact...

We all probably know, how powerful "Media" in today's world can be... Perhaps they can make or spoil fate of a person.. Shape an opinion or create a wave in a society...

What we do not know, is that Media can actually participate and beat something as brutal and killer as ISIS... It will be CNN or BBC who will be defeating ISIS...
How ??

It has been 2 weeks since US presidential election results have been declared...
The whole world of Intellectuals, leftists and seculars had  already declared Hillary Clinton to be the next president of US...  CNN and BBC were busy showing the lousy and not so polished side of Mr Trump.. the more negative they painted him, more it looked like Hillary will win...

But, the common US citizen had some other plans... he kept all the hullabaloo at bay and elected Mr Trump as his next president... Had it not been a non-stop campaign from all the media houses to target Mr Trump, he would have never stood a chance to win... By constantly targetting him, they contributed to a sympathetic factor of Mr Trump being alienated and targetted for all wrong reasons which worked a great way in closely contested election...

Wait, but the title of the article says " How CNN defeated ISIS without a gun... " so where the hell ISIS comes in US elections...

Remember, It was Hillary clinton as a Foreign affairs minister in Obama cabinet... So all the decisions were taken under her... US under Bush and Obama considered Saudi as their allies and hence did ignore the wrongdoings from Saudi kings and prince... Now the Saudi's are Sunni muslims and cannot bear with a Shia rule in its neighborhood... they would do whatever it takes to wipe out Shias from the face of this earth...
So, it goes like this...
In Syria, A Shia leader, Col Gaddafi was ruling a comparatively stable and progressive govt... In order to bring the state under Sunni influence, an uprising was planned and supported by Saudi... They provided funds and ammunition to the rebels for unsettling the establishment...

a new extremist organization is born.. we call it ISIS today... US knew this all the time but wanted to be in good books of the Saudi Kings hence chose to ignore...
When ISIS starts to become a threat to entire developed civilization, US needs to step in... but instead of acting against ISIS, which is actually a friend of friend (Saudi) it tries to contain them and instead chose to make #1 priority - remove the Shia dominated govt from Syria... so we can see US priorities defined by Saudis...
Here comes the twist...
Russia under leadership of Mr Putin, senses the chance to grab the central position in world politics, it once had... it steps in and starts attaking ISIS and supports existing Syrian establishment...
So now we have, ISIS fighting Syrian govt , Russia Backing Syrian Govt, US fighting ISIS (at least pretending to) and backing rebel groups who fight against Syrian govt, US supporting Saudi and Saudi backing ISIS...

With the win of Mr Trump, all the equations are set to change and same can be sensed from Obama's decision last week after meeting with Trump to abandon the rebel groups, US once harbored... US has agreed to join hands wit Russia and Syrian govt to attack the ISIS groups
For the reason that all the ulgy faces of US deeds will come out in open when new president takes over, Obama must bury the evidences  that US played  dirty...

Trump already made it clear that he will be more inclined towards Mr Putin and will be least interested in Saudi or Pakistan for that matter...

Had CNN and other Media houses not played their part, win was very much impossible for Mr Trump and the same old game would have continued ... but by unnecessarily attaking mr Trump too much, they have contributed unknowingly towards a decisive battle against ISIS...



Sunday, May 22, 2016

ओरखडे आणि चरे ….



जानेवारी महिन्यातील गोष्ट … चक्क रविवारच्या पहाटे (हक्काची) झोप-बीप सगळ सोडून मी मुंबई हून पुण्याच्या प्रवासाला निघालो … अर्थात त्या मध्ये सुद्धा स्वार्थ होताच … ११-१२ पर्यंत पुण्यात पोचलो तर रविवारची हक्काची मिसळ मित्रांच्या कंपू सोबत गप्पा मारत खाणे "हेचि फळ मम तपाला " मिळण्याची आशा मनी धरून मी ट्रेन मध्ये पाय ठेवला …

खिडकीची जागा, पहाटेचा गारवा (मुंबई मध्ये या वर्षी स्वेटर ची तडाखेबंद विक्री झालेली आहे - त्या मुळे थंडी होती हि गोष्ट पुराव्याने शाबित … ) अस सगळं जुळून आलं आणि मी लवकरच समाधी अवस्थेत प्रवेश केला… (ज्ञानेश्वरांचा रेडा होतास मागच्या जन्मी म्हणून इतक्या पटकन समाधी लागते तुझी - इति आई )
आजूबाजूचा गोंधळ, मुलांचे आणि फेरीवाल्यांचे आवाज सवयीचे झाले होते त्यामुळे त्याने झोपमोड होण्याचा प्रश्नच नव्हत… पण थोड्याच वेळात डब्ब्यात एक (लोणावळा) चिक्की, शेंगदाणे फुटाणे ई विकणारा माणूस आला …
(विषयांतर- खांबेटेखुर्द नावाच्या गावात जिथे दिवसातून एकच यष्टी येते, तिथे सुद्धा मिळणारी चिक्की लोणावळ्याचीच कशी काय असते बुवा ?? विषयांतर समाप्त )
त्याने entry मारल्याबरोबर त्याच्या खड्या  आवाजाने मी जागा झालो … जवळपास १५-२० मिनिटं तो तिथेच उभा राहून चिकाटीने  आणि त्याच्या दणदणीत आवाजात त्याच्या "मालाचं" मार्केटिंग करत होता… त्या खड्या (खरं तर भसाड्या) आवाजाने मी जवळपास दचकुनच डोळे उघडले …
"भट्टी मधून आणलेले शेंगदाणे घ्या , ताजे ताजे शेंगदाणे" "मुगाची डाळ घ्या, पचायला हलकी, प्रोटीन युक्त , डॉक्टरांची पण लाडकी" "बेसन मसाला लावलेले दाणे, चटका लावतील जिभेला आणि जड नाही खिशाला" अशी अथक बडबड चालू होती … खरं तर मी झोपमोड झाल्याने वैतागलो होतो … पण ५ मिनिटं गेली आणि मी त्याचं ते मार्केटिंग कुतूहलाने बघायला लागलो … सतत ओरडून त्याला तहान लागली असेल असं वाटत होतं … म्हणलं घ्यावे थोडे दाणे आणि विचारावं पाणी हवं  आहे का … पण अंगातल्या पांढरपेशा अलिप्ततेने जणू हात बांधून  घातले आणि तो निघून गेला ….

नंतर मनाच्या आरशावर पडलेला तो चरा किती तरी वेळ मला अस्वस्थ करत होता …

असे किती चरे आणि किती ओरखडे घेऊन आपण जगात वावरतो आणि नंतर नंतर त्यांचीही सवय होऊन जाते … त्रास होईनासा होतो …
रस्त्याकडेला एखादी म्हातारी केविलवाण्या चेहऱ्याने उभी असते… हातात मोठी पिशवी आणि वर उन्हाचा तडाखा …  रस्त्यावरचे सगळे स्वार बाजीरावाने घोडा पळवावा अशा थाटात दौडत असतात … वाटत बाईक थांबवून म्हातारीला रस्ता ओलांडून द्यावा… पण वेगात असलेली गाडी तितक्यात पुढे निघून जाते आणि आपण परत फिरून यायचं टाळतो … स्लो असतो तर केली असती मदत या खोट्या बहाण्यानी आणि अजून एका ओरखड्याची नक्षी घेऊन आपण पुढेच जातो …
कार घेऊन जाताना लिफ्ट मागायला थांबलेले हात, "मला काहीच दिसलं नाही " अशा आविर्भावात आपण झिडकारतो … मिळतो फक्त एक चरा ….

आई - बाबा सांगत असतात, अरे कधी तरी वेळ काढ … घराची सफाई करून घेऊ दिवाळी आधी … आपल्याला वेळ मिळत नसतो …शेवटी वैतागून तेच सफाई करून घेतात जमेल तशी … संध्याकाळी घरी गेल्यावर दिसतात ते दिवसभरच्या कामाने दमून गेलेले तरी कोणतीही तक्रार नसलेले चेहरे …

हे चरे आपल्याला सतत त्रास देत असतात … आणि सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे हे सगळं  तुम्ही कोणाशीच शेअर नाही करत … कारण त्यात तुमचीच इमेज खराब होणार असते … म्हणून हातात घुसलेल्या लाकडाच्या सडि सारख ते आपल्याला टोचत राहत … रक्त येत नाही आणि जीवाला स्वस्थता पण नाही …

असेच ओरखडे पडत पडत आपल्या समोरचा आरसा धुसर होत जातो … आपण मुळात असे नाहीये हे माहित असतं पण तरी आपल्या समोरचा आरसा आपलं खरं रूप दाखवत असतोच …

असो, आता ठरवलंय समोरचा आरसा स्वच्छ करायचा … रोज एक तरी चरा  कमी करायचा … बघूया किती जमतंय ते …




Monday, November 23, 2015

कट्यार काळजात घुसली ...


एक अप्रतिम  आणि अविस्मरणीय अनुभव… श्वास  पासून वेगळ्या वाटेवर चालू लागलेल्या मराठी चित्रपटांचा प्रवास नजर लागावा असाच आहे… आणि या प्रवासातला मेरुमणी ठरावी अशी एक कलाकृती म्हणजे "कट्यार" …


 माझी पिढी हि संगीत नाटकांचे युग संपल्यावर जन्माला आलेली … त्यामुळे संगीत नाटक या गोष्टीशी तसा परिचय नव्हताच … जरी साहित्य आणि संगीताची ओढ होती आणि संगीत नाटक किंवा शास्त्रीय संगीत या गोष्टींबद्दल  कुतूहल होते तरीसुद्धा त्यांच्याशी जवळून परिचय झालाच नाही … भीमसेन जोशींची ओळख केवळ त्यांच्या अभंगांमधून असलेला आणि पुण्यात राहूनही सवाई गंधर्व मध्ये कधी न गेलेला असा मी….  "कट्यार" , संगीत  किंवा शाकुंतल हि नावं  बहुतेक वेळा पुलंच्या साहित्यातून किंवा  आजोबांच्या (त्यांच्या लहानपणीच्या) गोष्टीं मधून कानी पडत आली … त्यांच्या बद्दल कुतूहल होतंच , पण त्यांचा अनुभव   घेण्याचा योग आज पर्यंत आला नव्हता … पहिल्यांदा संगीत नाटकाची ओळख झाली ते बालगंधर्व मध्ये… कुतूहल होतंच… त्याचे रुपांतर आवडीत झाले… आणि आज "कट्यार" पाहिल्यावर तर या परंपरेच्या प्रेमातच पडलोय…

सुबोध भावे, अस्सल पुणेरी संस्कृतीत वाढलेला, पुरुषोत्तम करंडकच्या वातावरणाचे संस्कार झालेला आणि पुलं, भीमसेन यांच्या वारशावर हक्क सांगू पाहणाऱ्या पिढीचा एक बिनीचा शिलेदार … त्याच्या अभिनयाबद्दल शंका कधीच नव्हती… ते त्यानी "बालगंधर्व" आणि "लोकमान्य" मध्ये सिद्ध केलंय …
पण  इतकी शिदोरी  असली तरी "कट्यार" करायला वाघाचं काळीज पाहिजे … कारण "कट्यार" म्हणलं कि डोळ्यांसमोर  उभी राहतात "पंडित वसंतराव देशपांडे", "पुरुषोत्तम दारव्हेकर" आणि "पंडित जितेंद्र अभिषेकी " (तिघांतले दोन पंडित आहेत बरं) अशा मातबरांची  नावं … त्यांच्या दर्जाला साजेल, शोभेल अशी कलाकृती करणं खायचं काम नाही (विश्वास बसत नसेल तर आठवा शोले चा  रिमेक किंवा भन्साळी चा देवदास) … पण आज "कट्यार" बघून आलो आणि वाटलं, सुबोध जर भेटला तर त्याला कडकडून मिठी मारावी आणि म्हणावं "मित्रा जिंकलस"…

"कट्यार" ची  फ्रेम  भव्य आहेच, त्याला उच्च निर्मिती मुल्यांची आणि ताकतीच्या कलाकारांची जोड सुद्धा आहे… पण त्यापेक्षाही जास्त खूप काही  आहे … दिग्दर्शकाची चित्रपट माध्यमाची असलेली जाण  आणि त्याच वेळी ""कट्यार"" वर असलेलं प्रेम प्रत्येक ठिकाणी जाणवतं … सचिन आपल्या  आयुष्यातली एक अजरामर भूमिका करून गेला आहे … त्याने रंगवलेला खान   साहेब बघताना आपण त्याचं मराठीपण विसरतो आणि त्याची हिरोची प्रतिमा कुठेही दिसत नाही … शंकर महादेवनचा अभिनय बघून, "हि  त्याची पहिलीच भूमिका आहे" यावर विश्वास ठेवणं निव्वळ अशक्य … त्याने साकारलेले राजस, कलाप्रेमी आणि तरीही नम्र पंडितजी निव्वळ अप्रतिम … परिस्थितीविरुद्ध बंड करून उठणारा, थोडासा  उतावीळ पण  गुरूंवर निस्सीम प्रेम, नव्हे भक्ती, असलेला सुबोधचा सदाशिव सुरेखच … अमृता खानविलकर नाच न करता सुद्धा सुंदर दिसते आणि मृण्मयी देशपांडे आपल्या संयत अभिनयाचा ठसा सोडून  जाते …
संगीत हा तर "कट्यार" चा आत्माच आहे… पण चित्रपटात रुपांतर करताना गाण्यांचे कथेवर आक्रमण होणार नाही आणि कथेच्या मागे गाण्यांची फरफट होणार नाही याची खबरदारी घेतल्याबद्दल "कट्यार" च्या टीम चे विशेष अभिनंदन"… खर तर "कट्यार" मध्ये अजून काही गाणी असती तर संगीत प्रेमींचे कान अजून तृप्त झाले असते … पण अशी हुरहूर वाटणे हे सुद्धा "कट्यार" चे यशच आहे …


सुरुवातीला रीमा लागुच्या आवाजातील कट्यारीचं मनोगत ऐकल्यापासून ""कट्यार"" आपल्या मनाचा ताबा घेते ते अगदी शेवटपर्यंत…  सुरुवातीला ऐकू येणारं "सूर निरागस हो" हे गाणं म्हणजे तर ""कट्यार""  च्या कथेचा आत्मा आहे… आणि हेच शब्द climax ला ऐकू येतात तेव्हा दिग्दर्शकाची पाठ थोपाटाविशी वाटून जातं … खांसाहेबांची एन्ट्री होताना त्यांच्या आणि पंडितजींच्या संगीतातील द्वंद्व, आहाहा … संगीत स्पर्धेतील खांसाहेबांनी अत्यंत आक्रमत आणि नजाकत भरी "दिल कि तपीश" ऐकून तोंडून नकळत वाह निघून जातो … त्यावर पंडितजींनी आपल्या संयत आणि मृदू गायकीत पेश केलेलं "घेई छंद मकरंद" तर निव्वळ अप्रतिम … गीताची ताकत हि हरकती आणि आक्रमकतेमध्ये नसून  शब्द आणि सुरांमध्ये आहे हे या अद्वितीय जुगलबंदीतून अनुभवून कान अक्षरशः  तृप्त होतात …   आणि त्याच वेळी पुढे सुरु होणारी जीवघेणी स्पर्धा आपल्याला आत अस्वस्थ करून जाते …

climax ला घेतलेली जुगलबंदीसुद्धा अशीच सुरेख … खांसाहेबांच्या प्रत्येक हरकतीवर मुहतोड जवाब देणारा सदाशिव जेव्हा "घेई छंद मकरंद" "सुरत पिया कि" च्या तालावर म्हणू लागतो तेव्हा आपण थक्क होऊन जातो… चित्रपट बघणाऱ्या कितीतरी आजी-आजोबांच्या डोळ्यात पाणी तरारतं आणि अंगावर शहारा येतो , नकळत आपलेही डोळे पाणावतात आणि भरल्यासारखे आपण उभे  राहून टाळ्यांच्या गजराला साथ देत त्यात हरवून जातो …

multiplex मध्ये मराठी चित्रपटाच्या शेवटला कडकडून टाळ्या पडतात आणि standing ovation दिलं जातं हे दृश्य खरच सुखावणारं आहे …

प्रत्येकाने (किमान) एकदा तरी बघावाच असा हा नितांतसुंदर आणि झपाटून टाकणारा अनुभव आहे … आणि यासाठी सुबोध आणि टीमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत …


© - चिन्मय जोशी

Thursday, May 15, 2014

बालपणीचा काळ सुखाचा.....


बालपणीचा काळ  सुखाचा म्हणतात … पण आपण लहान असताना ते पटत नाही आणि नंतर कळून फायदाच नसतो…
पण तरी खूप काही मिळत आपल्याला आपण लहान असताना …

अर्थात मला माझ्या लहान पाणी सगळ्यात जास्त मिळालेली कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे मार आणि बोलणी … पण त्यात माझा काही दोष नव्हता …
लहानपणी काय करायचं नाही हे जवळ जवळ प्रत्येक जण सांगायचा … पण आम्ही उद्योग करून रिकामे झाल्यावर …(आधी सांगितलं तर बहुधा आपल्याला भोगायची शिक्षा सावध करणाऱ्याला भोगायला लागत असावी … )

असो… तर त्या रम्य बालपणीचा काल (शिक्षांसाहित) आठवून आज खूप काही बोलावस वाटलं …. म्हणून शेवटी ब्लॉग खरडायला घेतला …

माझ्या लहानपणी आम्ही चाळीत रहात होतो… एकच खोलि… हल्लीच्या FLAT मधलं स्वयंपाक घर असत ना, तेवढीच …
उभ राहील आणि हात वर केला कि हात (खोलीच्या) आभाळाला टेकायचे (माझे नाही, मोठ्यांचे)…
पण ते घर अजून स्वप्नात येतं … तिथेच पहिले सवंगडी जमले…एक  तीन चाकी सायकल आणि एक जुना डालडयाचा  डब्बा आणि एखादी झिपरी बाहुली  एवढ्या साहित्यावर  सगळ्या चाळीतली तमाम प्रजा खुशीत खेळत असे… भांडण आणि मैत्री शब्द सुद्धा माहित नव्हते तेव्हा … भूक लागली कि घरी येउन खायचं, पाणी प्यायचं आणि परत खेळायला पळायचं …. तेव्हाचे किती तरी सवंगडी आता आठवत पण नहित … काहीतरी हरवल्याची जाणीव मात्र होत असते…

नंतर मग आम्ही एका २ रूम च्या स्वताच्या FLAT मध्ये गेलो… इथे तर खूप सारे समवयस्क मिळाले होते …आई-वडिलांची  मुलांच्या कटकटीतून सुटका करण्यासाठी गच्ची होतिच… दिवस दिवस भर उन्हातान्हात गच्चीवर, मैदानात खेळताना कधी सावळा होण्याची भीती नव्हती आणि कधी गोरा होण्याची इच्छा पण नव्हति… दिवसभर गच्चीत खेळायचं , वाटेल तेव्हा घरी येउन पाणी प्यायचं … संध्याकाळी शेजारच्या मैदानात मोठ्या दादा लोकांमध्ये क्रिकेट खेळायच… batting चा  चान्स मिळावा म्हणून २-२ तास कीपिंग करायची … घरी आल कि राजेशाही थाटात हादडायला बसण … ते पोह्याचे बकाणे भरणं … ऐटीत चालू होत सगळं….

मग अचानक एक दिवस शाळा नावाच्या एका गोष्टीशी ओळख झाली … सगळीच लहान लहान मुल… आणि एकसारखेच कपडे घातलेली…. मी पहिल्याच दिवशी रडून इतका गोंधळ घातला कि बाईंना आईला तिथेच बसवून ठेवावं लागला (यालाच बाळाचे पाय पाळण्यात  दिसणे म्हणतात का ??) … नंतर मात्र शाळेची मज्जा वाटायची … रंगांची नवे, मातीचे आकार, भाज्यांची नावे, अंक, बाराखडी  आणि पाढे (मला अजूनही १३ च्या पुढचे पाढे येत नहित… ) हे सगळ खूप खूप आठवतंय आता …

त्याच शाळेतली एक गम्मत आठवते  … अ आ इ ई शिकताना "फ" पाशी आमची गाडी अडली… कारण घरी काही आगाऊ पणा केला कि आई ओरडायची … "फ - फ फटक्यातला देऊ का …??"काकांचं सुद्धा तेच वाक्य ….
आणि बाई (तेव्हा त्यांच्या madam नव्हत्या झाल्या ) शाळेत शिकवताना "फ रे फणसाचा " शिकवायच्या … मी मात्र जोरात "फटका च " म्हणायचो … बाईंनी ओरडून, मार देऊन सुद्धा मी मात्र "फ" रे फटक्याचा म्हणायच सोडलं नाही आणि उलट शेजारच्या मुलांना आपलंच म्हणणं पटवून द्यायला लागलो ….
शेवटी माझ्या बरोबरची सगळी मुलं  "फ - फ फटक्यातला" म्हणायला शिकली आणि माझ्या पालकांना  शालेय जीवनातील पहिले पान-सुपारीचे आमंत्रण गेले…(एकुणात जर आमंत्रणांचा हिशेब काढला तर माझ्या इतकीच हजेरी माझ्या आई-बाबांनी लावली असावी माझ्या शाळेमध्ये … )

तेव्हा आईच घरी अभ्यास घ्यायची … शिकवणी हा प्रकार मला तरी ६ वी पर्यंत माहितच नव्हता …
आणि अभ्यास सुद्धा १ तासात संपत असे… संध्याकाळी मात्र सभ्य मुलासारखं शुभंकरोती, पर्वचा आणि पाढे (१७, २३, २७ आणि २९ चा अडखळतच) म्हणावे लागायचे …

तसे माझे बाबा काही मारकुटे किंवा तापट नहियेत… पण तरी त्यांची घरी यायची वेळ झाली कि पावले आपोआप घराकडे वळायची ….


मला आठवतंय तस माझ्या बाबांनी (मी अजूनही बाबाच म्हणतो - आणि कधी कधी आदरानी "पिताश्री" किंवा "कुटुंब प्रमुख" ) मला एकदाच मारलं आहे… (आईचा रतीब मात्र न चुकता चालूच  होता )…
झाल असं होतं कि, मला सायकल शिकवायची ठरलं … आमच्या धाकट्या बहिणाबाईंनी धडपडत स्वतःच  सायकल शिकून घेतली, आणि आमचा उत्साह मात्र कुठेच दिसेन… सायकल पेक्षा "आक्क्या-टोक्क्या" आणि "डब्बा ऐस-पैस " मधेच मला मज्जा वाटायची ....
मग मात्र पिताश्रींची "सायकल प्रशिक्षण" मोहिमेवर नेमणूक झाली आणि रोज संध्याकाळी आम्ही हर्क्युलीस चे २४ इंची धूड अंगावर घेऊन धडपडू लागलो… सिटला पकडून पळताना बाबांचं पोट  हलकं झालं आणि सोफ़्रामायसिन च्या ट्युब आणून खिसा हलका  व्हायला लागला …पुढे पुढे लडखडत आमची सायकल चालायला लागली ...
एक दिवस मात्र मी त्यांच्या पायाच्या अंगठ्यावरच सायकल आणून उभी केली, आणि तिरमिरीत त्यांनी दिली एक थोतरीत ठेउन (कुठे तो एकलव्य ज्याने आपला अंगठा कापून दिला आणि कुठे आम्ही;  सायकल शिकवणाऱ्याच्याच अंगठ्याचा अचूक वेध घेतला)… पुढचे २ दिवस गालगुंड झालाय असं खोटंच सांगत शाळेत जाव लागलं…
एकदाची सायकल जमायला लागली आणि आम्ही घरातून लान्स आर्मस्ट्रोंग च्या थाटात  सायकल वर शाळेत जाऊ लागलो …


सायकल वरचाच एक किस्सा आठवला … लहानपणी पाप आणि पुण्याचे हिशोब खूप जपले जातात … गाई च्या पोटात ३३ कोटी देव असतात असे मला सांगितलेले होते … त्यामुळे जिथे गाय दिसेल तेथे तिच्या पोटाला हात लावून नमस्कार करणे हा एक नित्याचाच भाग झाला होता … एकदा अस्मादिक शाळेला निघालेले असताना रस्त्यातल्या एका कचराकुंडीपाशी एक गो-माता क्षुधा शांती करत असताना दिसली … सायकल चालवायचा आता बऱ्यापैकी (खरं तर अति ) आत्मविश्वास आलेला असल्याने खाली न उतरता गाई च्या जवळून सायकल नेउन तिच्या पोटाला हात लावून (जाता जाता) पुण्य कमावण्याच्या प्रयत्नात मी होतो … मी जवळ आल्या बरोबर तिने आपल्या शेपटीचा गोंडा (ज्याला शेण लागून ते वाळलेले होते) माझ्या गालावरून अंमळ प्रेमाने फिरविला …. इतका अकस्मात कृपा प्रसाद मिळाल्याने पुढच्या सेकंदाला मी गो-मातेचे आशीर्वाद घेत तिच्या पायाशी (तिच्याच शेणाच्या पो मध्ये) लोळण घेतली आणि माझी सायकल कचराकुंडी मध्ये अंतर्धान पावली …. पुढचे किती तरी दिवस लग्न, मुंज, वाढदिवस, घरी आलेले पाहुणे ई. प्रसंगी चार टाळकी एकत्र जमली कि माझा हा किस्सा नक्कीच सांगितला जाई ….

असो …


आमच्या शाळेबद्दल थोडंसं … 
माझ शिक्षण मराठी मधून ७ व्या इयत्ते पर्यंत (न गचकता ) आणि  नंतर semi  इंग्लीश मध्ये(तिथेहि न गचकता) …. माझी शाळा चिंचवड मधली तशी खूप प्रसिद्ध शाळा … पण त्याला मैदान नव्हत … त्याची कसर आम्ही शाळे समोरच्या बागेत खेळून भरून काढायचो … सगळ्यात जास्त मजा यायची ती क्रिकेट मैच असेल तेव्हा … आमच्या शाळेच्या शेजारी एक चाळ  होती … त्याच्या एका घराची खिडकी बरोब्बर आमच्या वर्गाच्या खिडकी समोर यायची … आणि तिथल्या काकू मैच असेल तेव्हा खिडकीत पाटीवर स्कोअर लिहून ठेवायच्या …. त्या काकुंच नाव सुद्धा माहित नव्हत … पण मुलांचा दंगा ऐकू आला कि त्या स्कोअरबोर्ड अपडेट करून ठेवायच्या … तो स्कोअरबोर्ड आजही माझ्या डोळ्यांसमोर तसाच आहे….

परवा शाळेकडे गेलो होतो तेव्हा कळलं कि ती चाळ पाडली आहे … कदाचित त्यामुळे सुद्धा असेल किंवा तेंडूलकर रिटायर झाला म्हणून असेल, यंदाच्या  IPL मधल्या मैच मध्ये मनच रमत नाहीये …


शाळेच्या सहलीला जायचं म्हणजे तर जत्रे इतकीच धमाल मज्जा … पहिली सहल मला आठवतीये ती म्हणजे सारसबाग आणि पेशवे पार्क … पण खरी धमाल यायची गड किल्ल्यांच्या सहलीला …पहाटे ५ ला शाळेपाशी जमायचं… स्वेटर घातलेले सगळे मित्र-मैत्रिणी … बस मध्ये खिडकीची जागा पकडण्यासाठीची भांडणं … प्रत्येक स्टॉप नंतर होणारी हजेरी …. सिंहगडावर आमच्याच सरांनी दही वाल्याच्या सुरात सूर मिसळून मारलेली "दहीsssय्य" अशी आरोळी …. आईने दिलेले २० रुपये, त्यात घरी काहीतरी आठवण म्हणून घेऊन जाणं … आणि शाळेकडून काढल्या जाणारया ग्रुप फोटो मध्ये आपण दिसू का याची उत्सुकता …. खरच किती मिस करतोय हे सगळ …


शाळेत असताना सुट्टी म्हणजे तर पर्वणीच वाटायची … उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मामा, काकांकडे जाणं … तिथे शेतात भटकायचं … बैलगाडी मधून लिफ्ट घ्यायची … कारखान्याला जाणार्या गाडीतली उसाची कांडकी काढून सोलून खायची … झाडावरच्या कैऱ्या पाडून खायच्या … दर वर्षी १ महिन्या पुरते भेटणारे नवे सोबती … आणि परत येतानाचा तो ६-७ तासांचा कंटाळवाणा प्रवास …
दिवाळीच्या सुट्टी मध्ये छान पैकी उटन लावून अंघोळ… नवीन कपडे, फराळ आणि फटाके … सकाळी पहिला बॉम्ब कोण फोडणार आणि कोणी किती पिशव्या भरून फटाके आणले याचीच  स्पर्धा….  भाऊबिजेला बहिणीला ओवाळणी देताना बाबांनी दिलेले १० रु सुद्धा तिला किती मोलाचे वाटायचे …


असो … तर आज सगळ आठवून खूप छान वाटलं … काहीतरी पुन्हा नवीन सापडलंय आणि बरच काही कायमचं हरवलंय …. 
पण एक मात्र खर … बालपणीचा काळ  सुखाचा हेच खर … सुख म्हणजे अजून काय असत ??